Thursday, April 4, 2019

दुष्काळ वृत्तबद्ध कविता

वृत्त- परिलिना २२ मात्रा [६+६+६+४]
        
------ सांग कसे दुष्काळा विसरू -----

भूकेने हातावर, ओघळले अश्रू
भगवंता सांग कसे, दुष्काळा विसरू

का करतो रोजचीच, कुरघोडी निसर्ग
बांध कुठे उरले? नी पाण्याचा विसर्ग

जगू कसे? काहीही उमगेना आता
सतावते ही चिंता, मज येता जाता

एवढ्यात हरवलीत, अशी कशी नाती
आडदांड भेगांनी, विस्कटली माती

इतुकं हे करूनही, रिकामीच झोळी
चाऱ्याविन उपाशीच, जनावरं भोळी

रूसलाय मेघराज, सुकलेले डोळे
काळजीत उठलेले, उदरी हे गोळे

सावकार आवळतो, कर्जाच्या गाशा
धुसर धुसर होते मग, उरलेली आशा

कोवळ्याच वयात मी, उजवील्या पोरी
वाढवणं कसंबसं, वाटे मज चोरी

ठेवूनी पिढ्यातला, गहाण हा वाडा
ओढतोय रोज रोज, प्रापंचिक गाडा

फुलो मळा भरभरून, हेच स्वप्न बघतो
कसाबसा शेतकरी, जीवन हे जगतो

अंधकार भरलेला, जीवनात सारा
झोंबणार कायम हा, दुष्काळी वारा

----- *सागरराजे निंबाळकर* -----
         उल्हासनगर, ठाणे

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !