Tuesday, June 16, 2020

निस्सीम प्रेमाला अटी-शर्ती नसतात

----- निस्सीम प्रेमाला अटी-शर्ती नसतात -----

     शर्वरी आणि सागर बालपणापासूनचे मित्र. दोघांच्या घरात फक्त दहा मिनिटांचं अंतर. शाळेत एकाच बाकावर बसणं, एकमेकांच्या डब्यातलं हक्कानं खाणं, सणावाराला एकमेकांच्या घरी जाणं इतकी सहजता नात्यात होती. दोघेही अभ्यासात हुशार. थोड्या फार फरकाने कधी शर्वरी पहिल्या क्रमांकावर तर कधी सागर. शाळेत 'दो हंसो का जोडा' नावाने प्रसिद्ध. दोघांच्या घरची परिस्थिती काहीशी बेताची त्यामुळे काटकसर, मेहनत हे गुण उपजत होते. 

     सहावीला असताना अपघातामुळे शर्वरीचे बाबा देवाघरी गेले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातली एकुलती एक कमावती व्यक्ती गमावल्याने आता पुढे काय? हा प्रश्न शर्वरीच्या आईला सतावत होता. शर्वरी आणि तिच्या पाठचे दोन भाऊ असल्याने शेवटी आईने काम करण्याचा निर्णय घेतला. दुसरा पर्यायही नव्हताच ! शर्वरीही दुःखात होती त्यामुळे शाळेत तिचा पूर्वीसारखा वावर नव्हता. सागरला तिच्या मनाची घालमेल कळत होती त्यामुळे जमेल तितका भावनिक, मानसिक आधार तो तिला देत होता. 

     प्राथमिक शाळा सातवीपर्यंतच असल्याने पुढील शिक्षणासाठी दोघांनाही वेगवेगळ्या शाळेत जावं लागलं. आपलं माणूस दुरावल्याची जाणीव मनाला सलत होती. शर्वरीला घरच्या जबाबदारीमुळे सहसा बाहेर जायला मिळत नसल्याने सागर अधूनमधून चौकशीसाठी तिच्या घरी जात असे. 
बालपणीच्या निरागस प्रेमाचं रूपांतर आता हळूहळू हव्याहव्याशा प्रेमात व्हायला लागलं होतं. तशी विचारणा दोघांपैकी कोणीही केली नव्हती पण नजरेच्या खेळातून मूकसंमती मात्र मिळाली होती. 

     असंच एकदा दिवाळीचं निमित्त गाठून सागर शर्वरीच्या घरी गेला मात्र दाराला कुलूप होतं. शेजारी चौकशी केली असता कळलं की आता ते तिथे राहत नाहीत. त्यांचं ते स्वतःचं घर नसल्याने त्यांना ती खोली सोडावी लागली. त्याकाळी दोघांकडेही दूरध्वनी नसल्याने आणि पत्रव्यवहार करावा तर कोणत्या पत्त्यावर? हा प्रश्न सागरला पडला. 

     दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुन्हा नवीन महाविद्यालयात सागरने प्रवेश घेतला. एके दिवशी मित्रांबरोबर व्यायामशाळेत जाताना अचानक त्याला शर्वरी दिसली. 'तुम्ही व्हा पुढे' असं म्हणत सागरने शर्वरीला हाक मारली तशी ती थांबली. तब्बल दोन वर्षांनी भेट झाल्याने दोघे एकमेकांना पाहतच राहिले. काही काळाने भानावर येत शर्वरीने विचारलं "तू इथे कसा?" "मी इथे प्रवेश घेतला आहे" असं सागरने सांगितल्यावर तिला आनंद झाला. कारण आता दोघेही एकाच ठिकाणी शिक्षण घेत होते. 

     महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचं निमित्त गाठून आपल्या भावना शर्वरीला सांगायच्या असं सागरने ठरवलं. घरी जाताना तिचे दोन्ही हात हातात घेऊन सागरने एकदाची आपल्या भावनांना वाट करून दिली. "आता हे शक्य नाही सागर" असं म्हणत शर्वरी सागरच्या कुशीत शिरून आसवे गाळू लागली. 
"काय झालंय नेमकं शर्वरी?" सागरने तिचे डोळे पुसत विचारलं. शांत होत शर्वरीने सांगायला सुरुवात केली. 

     'बाबा गेल्यावर आई कसंबसं घर चालवत होती. पण जसजसं आम्ही मोठे होत गेलो आर्थिक ताण येत गेला. बाबांनी पूर्वी काहीजणांकडून छोटे-मोठे कर्ज घेतले होते ते परत करण्यासाठी देणगीदारांनी तगादा लावला. भाडं वेळेवर देता येत नसल्याने घरमालकाने खोली सोडण्याचा आग्रह धरला. काही काळ आम्ही माझ्या काकांकडेही राहिलो.' पण असं किती दिवस चालणार? काकांनीही घरगुती अडचणींचं कारण पुढे करत आता तुमचं तुम्ही बघा म्हणत घराबाहेर काढलं. 

     गेले सहा महिने आम्ही एका वडाच्या झाडाशेजारी झोपडी करून राहत होतो. आईच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने तिने फाशी घेऊन आत्महत्या केली. 
दोन लहान भावांची जबाबदारी असल्याने नाईलाज म्हणून मी देहविक्रीचा व्यवसाय करू लागले. 'आयुष्यभर हेच नाही करायचं रे मला' म्हणून मी दिवसा शिक्षण घेत रात्री हा प्रपंच करते. एक-दोनदा तुझे मित्र पण तहान शमवून गेले. 'त्यांनी सांगितलं नाही का तुला?'
हे सगळं ऐकत असताना सागरचे डोळे अखंड वाहत होते. त्याने काहीही न बोलता तिचा हात धरला आणि तिच्या दोन्ही भावंडांसवे तिला थेट स्वतःच्या घरी नेलं. 

     घरी येताच सागरने आई-बाबांना सांगितलं, 'मला हिच्याशी लग्न करायचं आहे. जर ही नाही तर दुसरी कुणीच नाही.' सागरचे आई-बाबा शर्वरीला ओळखत होते. अचानक सागरने असा निर्णय का घेतला हे त्यांना कळत नव्हतं. रात्रीचं भोजन आटोपल्यावर सागर आणि शर्वरीला समोर बसवून सर्व हकीकत त्यांनी जाणून घेतली. काय प्रतिक्रिया द्यावी हे दोघांनाही सुचत नव्हतं. 'काढू आपण काहीतरी मार्ग' असं म्हणत त्यांनी सगळ्यांना खोलीत झोपायला जाण्याची सूचना केली. सकाळी दोघांनीही आपला निर्णय कळवला. 'लग्न अवश्य लावू पण इतक्यात नाही. अगोदर दोघे शिक्षण पूर्ण करा. आपापल्या पायावर उभे राहा. तोवर शर्वरी आणि तिचे दोन्ही भाऊ आपल्याकडेच राहतील.'

     निर्णय ऐकून दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. दोघांनीही उत्तम गुणांनी शिक्षण पूर्ण केलं. दोघांनाही भरघोस पगाराची नोकरी मिळाली. 
ठरल्याप्रमाणे दोघांचं विधिवत लग्न झालं. शर्वरीची दोन्ही भावंडं उच्च शिक्षण घेत आहेत. सगळं आलबेल सुरु आहे. 

     बऱ्याच दिवसांनी न राहावल्याने रात्रीचं भोजन आटोपल्यावर शर्वरीने सागरला विचारलं, 'माझी अशी परिस्थिती असताना, समाजात अशा गोष्टींना मान नसताना तू मला का स्वीकारलं?'
सागर उत्तरला, 'आई-बाबांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या मनावर मी भाळलो आहे. निस्सीम प्रेमाला अटी-शर्ती नसतात.'

जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था 
लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है 

या ओळी गुणगुणत दोघेही एकमेकांच्या कुशीत शिरून शांत निजले. 

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !