शीर्षक :- मी अनुभवलेली कृतज्ञता आणि माणुसकी
शब्दसंख्या :- ५९०
वर्ध्याला आमचा वाडा होता. भाजीमंडईच्या अगदी शेजारीच. देशमुखांचा वाडा म्हणून प्रसिद्ध. आज्जी-आजोबा, माझे वडील आणि त्यांचे चार भाऊ आपापल्या कुटुंबासोबत वाड्यात राहायचे. प्रत्येकाची वेगवेगळी खोली पण रात्रीच्या जेवणाला मात्र सगळे माजघरात एकत्र जमायचे. वाड्याच्या बाहेर भलंमोठं अंगण आणि त्यात एक बगीचा होता.
आम्ही सगळी भावंडं आज्जी आणि आजोबांच्या खोलीत झोपायला असायचो. दोघे रोज नवनवीन गोष्टी सांगायचे त्यामुळे त्यांचा विशेष लळा होता आम्हा सर्व भावंडांना. आजोबांची परिस्थिती त्याकाळी विशेष नसल्याने त्यांनी सर्व मुलांना जेमतेम प्राथमिक शिक्षण दिलं. माझे चारही काका शेती करायचे आणि माझे वडील आमच्या वाड्याशेजारी असणाऱ्या वाण्याच्या दुकानात कामाला होते. माझ्या आजोबांना त्यांच्या मुलांचा विशेष गर्व होता. ते नेहमी म्हणायचे, 'मी पोरांना जास्त बुकं शिकवू शकलो नाही. पण, प्रामाणिक, कष्टाळू आणि निर्व्यसनी म्हणून माझ्या पोरांनी सगळ्या गावात नाव कमावलं. माझ्या सगळ्या सुनापण मला लेकीसारख्याच आहेत.'
वृद्धापकाळाने आजोबांचं निधन झालं. त्यानंतर दोन वर्षांनी आज्जीही गेली. पुढे चालून भावंडांमध्ये थोड्या कुरबुरी होऊ लागल्या. हळूहळू भांडणं टोकाला गेल्याने वाड्याच्या वाटणीपर्यंत विषय गेला. माझ्या वडिलांनी मुंबईला येण्याचा हट्ट धरल्याने अखेर वाडा विकून आलेले पैसे पाचही भावंडात समसमान वाटून घेतले गेले. आमच्या वाड्यासमोर गवळी नावाचे गृहस्थ राहायचे. त्यांचे दोन तबेले होते त्यांनी वाडा खरेदी केला.
मुंबईला आल्यावर काही दिवस आम्ही भाड्याने राहिलो. बाबांना सरकारी नोकरी लागली आणि आमचे दिवस पालटले. बाबांनी स्वतःचं घर घेतलं. मी आणि माझी लहान बहीण शलाका आम्हा दोघांनाही चांगलं शिक्षण दिलं. आज मी एमबीबीएस असून माझं स्वतःचं इस्पितळ आहे. बहीण वकील झाली. सगळं आलबेल आहे पण राहून राहून वाड्याची, आज्जी आजोबांची फार आठवण येते. आज वाडा असता तर... असा प्रश्न पडतो.
एकदिवस धाडस केलं आणि वडिलांजवळ विषय काढलाच ! बाबा, मला आपला गावचा वाडा परत मिळवायचा आहे. तुमचं सहकार्य मला हवं आहे. "त्या वाड्यात आता काय राहिलंय सतीश? तो वाडा अनेक वर्षांपासून बंद आहे. पडझड झाली असेल सगळी. तुला शहरातला ऐशोआराम टोचतोय का?" असं म्हणून बाबांनी नकारघंटा चालूच ठेवली. मीही हट्टाला पेटल्याने शेवटी बाबांनी तयारी दर्शवली. मी एकही पैसा देणार नाही. सगळं तू बघायचं या अटीवर.
कधी एकदा वर्ध्याला जातोय आणि वाडा पाहतोय असं झालं होतं. जागेचा व्यवहार असल्याने शलाकालाही सोबत घेतलं. गावी पोहोचल्यावर वाडा पाहिला आणि आनंद गगनात मावेनासा झाला. गवळी काकांकडे वाड्याची चौकशी करावी म्हणून त्यांच्या घरी गेलो. माझ्या वडिलांना पाहताच म्हणाले "तू विश्वनाथ ना रे, सर्जेरावांचा धाकटा मुलगा." बाबांनी 'हो' म्हटलं. चहापान आणि औपचारिक गप्पा झाल्यावर मी गवळी काकांना वाड्याबद्दल विचारलं. ते म्हणाले "अजून मी विकला नाही कुणाला. पण तू का विचारतोस असं?'' मी त्यांना आमच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. त्यांनी तात्काळ वाड्याच्या किल्ल्या माझ्या हातात ठेवल्या आणि म्हणाले "वाडा तुमचाच आहे. ताब्यात घ्या आणि पुन्हा त्या वास्तूचं नंदनवन करा."
इतक्या सहज, कसलाही व्यवहार न करता काकांनी किल्ल्या दिल्याचं आश्चर्य वाटल्याने त्यांना कारण विचारलं. ते म्हणाले, "तुझे आजोबा आणि मी घनिष्ठ मित्र होतो. आज मी जो काही आहे तो तुझ्या आजोबांमुळे. माझे आई वडील लहानपणी गेले. एक मित्र म्हणून, मोठा भाऊ म्हणून तुझ्या आजोबांनी मला सहारा दिला. थोडंफार शिकलो. मिळेल ते काम करत, पैसा साठवत दोन म्हशी घेतल्या. दोन तबेले कधी झाले कळलंच नाही. माझ्या सर्जेरावाचा वाडा दुसऱ्या कुणाकडे गेला असता तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. म्हणून मीच घेतला विकत. हे सगळं त्यावेळी सांगून उपयोगही झाला नसता. सगळ्यांच्या डोक्यात वाटणीचं भूत शिरलं होतं." हे सगळं ऐकत असताना बाबांच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना आणि माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते.
आपल्याला मदत केलेल्या व्यक्तीबद्दल केवढी ही कृतज्ञता ! गवळी काकांच्या रूपात मला माणुसकी, कृतज्ञपणा जिवंत असल्याचा अनुभव आला.
इतक्या वर्षांपासून मनाला सलत असलेली गोष्ट आज आनंदात परावर्तित झाली होती. गवळी काकांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्याच हाताने नारळ वाढवून वाड्याचं दार उघडलं. महिनाभर मेहनत घेऊन डागडुजी, रंगकाम, बगीचा सगळं बनवून घेतलं.
वर्ध्यातही आता मी इस्पितळ बांधलं आहे. नाव दिलंय सर्जेराव इस्पितळ. ज्यांची परिस्थिती नाही त्यांचा इलाज मोफत केला जातो.
आजोबांच्या मदतकार्याला, गवळी काकांच्या कृतज्ञतेला, मी अनुभवलेल्या माणुसकीला सतत जिवंत ठेवण्यासाठी !
@ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !