----- माझ्या गावचा पार -----
गावाकडच्या पारावर जेव्हा
भेटायचो आम्ही सारे मित्र
रंग भरले जायचे आपुलकीचे
उभं राहायचं एकजुटीचं चित्र
प्रपंचाने वेगळं केलं साऱ्यांना
कोणी पुणे, कोणी मुंबई गाठली
मन रमत नाही मायानगरीत
कुणा सांगायची सल मनातली
पत्र येता आईचं, कळवायची
खोटीच ख्याली खुशाली
तिनेही लपवलंच की दुःख
करून, आनंद आमुच्या हवाली
चक्कर होते अध्येमध्ये गावी
योग भेटीचा जुळून येत नाही
भेटलाच कुणी तर म्हणतो
मी ठीक, तुझंच सांग नवं काही
आता पार नाही, झाडही नाही
त्याजागी, बंगला उभा झाला
उत्सुकतेपोटी पाहायला गेलो
मालक, माझाच मित्र निघाला
आदरातिथ्य केलं त्याने, मात्र
बदलली होती त्याची देहबोली
सहज म्हणाला तो, विसर जुनं
नको ठेवू, जखम तशीच ओली
मुळासारखी घट्ट मिठी कालची
आज हस्तांदोलनाने, सैल झाली
गोळा करून आठवांचा पाचोळा
पाऊले आपापल्या दिशेने निघाली
गर्दीत आधुनिकतेच्या हरवला
माझ्या गावचा एकमेव पार
दिसला तसाच कुठे, तर त्यावर
बसेन घटकाभर, पुन्हा एकवार
🌿 सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !