ढाळली आसवे आणि गेले घरी
शेवटी राहिली मोकळी पायरी
स्वप्न साकारले जिद्द ठेवून मी
रोखले, वेढले संकटांनी जरी
लाख केले जवळ दूर जाते तरी
हीच प्रेमातली खंत आहे खरी
हेरले जायचे चारचौघातही
दुःख होते तिचे एवढे भरजरी
कोणते प्रश्न अन् कोणती उत्तरे
एकमेका असे दूर केल्यावरी
एक असतो विषय भावना वेगळ्या
कोण लिहितो खुले कोण अल्पाक्षरी
मोकळे बोलणे प्रांत नाही तुझा
सोस तू आतली चेंगरा चेंगरी
वाटले जर मला एकटे-एकटे
ठेवतो मी तुझे पत्र छातीवरी
कालपर्यंत जी खेळली अंगणी
आज सोडून ती दूर गेली परी
📧 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !