Tuesday, May 23, 2023

स्पष्टीकरण देता येत नाही

~ कधीकधी आपल्याजवळ उत्तरं असूनही स्पष्टीकरण देता येत नाही..

अडीअडचणी नाहीत असा एकही मनुष्य या भूतलावर नाही.
प्रत्येकाला कुठे ना कुठे ठेच लागतेच.
अनेकदा प्रामाणिक प्रयत्न करूनही अडचणी सुटत नाहीत.
अशावेळी धीर देणारे, साथ देणारे, पाठराखण करणारे हात फारच कमी असतात. 

आपण आजवर जेवढं काही यश मिळवलेलं असतं ते केवळ एका अपयशाच्या छायेत झाकोळलं जातं.
आणि इथूनच सुरू होते मूल्यमापन.
तू अमुक केलं असतं तर तमुक झालं असतं.
तुला अमुक सुचलं नाही का?
तुझी बुद्धी गवत चरत होती का? वगैरे, वगैरे..

आपण हे करून पाहूयात का?
मी तुझ्यासाठी काय करू शकतो?
असं कोणीही म्हणत नसतं.

ज्याचं जळतं त्यालाच कळतं ही म्हण मनातल्या मनातच म्हणता येते अशावेळी.
कारण सद्यस्थिती असतेच अशी की स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न जरी केला तरी त्याला बहाणे, आळस, अहंकार अशी झालर लावली जाते.

घुसमट होते, इच्छा मरते
गढूळ आहे, दुःख खरोखर

प्रत्येकाची, दशा निराळी
कोण चूक अन्, कोण बरोबर

घडलेल्या गोष्टींचे चिंतन करणे क्रमप्राप्त असते परंतु ते करत असताना कोणी दूषणे देऊन खंडन केले तर तो घाव बंदुकीच्या गोळीपेक्षाही मोठा वाटतो.
मदतीचा एक हात अस्मानी संकटांवर मात करू शकतो हे मोजक्यांना कळतं.
अपेक्षा ठेऊन केलेली मदत व्यवहारात गणली जाते.

घासामधला, घास द्यायला
मोठे काही, लागत नाही 

आयुष्याला, नाव वेगळे
याहून दुजे, आहे काही?

सुविचार फक्त कानावर पडून उपयोग नसतो ते आत काळजावर कोरले गेले तरच जीवनाचं सार्थक होतं.

अन्यथा खेदाने म्हणावे वाटते -

नाही माझे येथे काही उशिरा कळले
पर्वा नाही कोणालाही उशिरा कळले

फक्त मानले म्हणजे सारे अपुले नसते
नाव पाहिजे नात्यालाही उशिरा कळले

मित्रहो, खरंय ना हे?

शब्दांकन - सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !