~~ घ्यावे सामावून
आलीय समीप । वेळ निरोपाची
उसण्या श्वासांची । रिपरिप
लागेना कशाचा । ताळमेळ आता
ठेच येता-जाता । नियतीची
दिसेना कुठेच । आशेचा किरण
शेवटचा कण । आहे हाती
नाही शक्य झाली । स्वप्नांची पूर्तता
बळेच हसता । वाटे सोंग
चुकलेच म्हणा । आपलेही खूप
थोडे सुखरूप । राहताना
कीर्ती तरी मागे । कशी उरणार
जो-तो मोजणार । कर्म सारे
घ्यावे सामावून । देवा उदरात
सोडू नका हात । इहलोकी
■ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !