🤝🏻 आधार बनूया..
*निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा निचरा झाला तरच ती हलकी होत असते.* मग ते जमिनीतलं पाणी असो, मनातली खंत असो, दुःख असो, वेदना असो वा आशा-अपेक्षांचं ओझं असो.
एखाद्याच्या आनंदात सामील होता आलं नाही किंवा एखाद्याने सामील करून घेतलं नाही तरी चालेल परंतू दुःखात मात्र न मागता आधार अवश्य द्यावा. शरीर कितीही बलाढ्य असलं तरी मन नाजूक असतं.
मनोरा तेव्हाच ढासळतो जेव्हा पाया कमकुवत होऊ लागतो.
काय सतत त्याचं/तिचं सांत्वन करत राहायचं असं काहींचं म्हणणं असतं. "सांत्वन" आणि "आधार" यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. "काळजी नको, मी तुझ्यासोबत आहे" आधाराचं हे एक वाक्यदेखील खूप काही करून जातं.
कधी नाईलाज, कधी हतबलता, कधी भीती तर कधी परिणामांची चिंता यामुळे मनुष्य अस्वस्थ असतो. ठरवून कधीही, कोणीही स्वतःची दुरावस्था करून घेत नसतं. निसरड्या वाटेवरून पाय हा घसरायचाच पण तिथे सावरणारा एखादा हात असेल तर फारसं नुकसान होत नाही..
आधार देत असताना त्याला उपकाराचं वलय लाभणार नाही ही काळजी देखील घेतली पाहिजे. "हे माझ्या वाटणीचं नव्हतंच" हा विचार करून जेव्हा आपण मदत करतो तेव्हा ती निरपेक्ष मदत म्हणून गणली जाते.
आपल्या वागण्याने समोरच्या व्यक्तीच्या भावनांवर काय परिणाम होईल याचा विचारदेखील आपण करायला हवा. आपल्या कठीण काळात ज्या व्यक्तीमुळे गोष्टी सुलभ झाल्या त्या व्यक्तीला नंतर केवळ स्मृतीत ढकलणे योग्य नाही.
समुद्रकिनारी वाळूचा किल्ला बनवल्यावर सागराच्या लाटेने तो जर भुईसपाट झाला तर वाईट वाटण्याचं कारण काय? किनारा त्याचा, वाळू त्याची, लाटही त्याचीच !
आपला किल्ला त्याच्या हद्दीत होता..
एखाद्याला आधार दिल्याने आपलं पुण्य, संचित वाढतं की नाही याबद्दल ठोस माहिती नाही. परंतु त्याचं मनोबल वाढतं, त्याचा आत्मविश्वास वाढतो यात मात्र काहीच शंका नाही.
*आजार सृष्टीकडून येतातच आपण आधार बनूया.*
धन्यवाद !
🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !