▪️क्रियेला प्रतिक्रिया असते..
*वात जळते हे खरं असलं तरी पर्यायाने चटका दिव्यालाही लागत असतो.*
कधीकधी आपण स्वतः आपल्या दुःखाचं कारण असतो किंवा कुण्या दुसऱ्यामुळे देखील आपल्याला वेदना होत असतात. "अपराधीपणा" आणि "भावनाशून्यता" या दोन्हीतला फरक आपण समजून घेतला पाहिजे.
जर आपण एखाद्याच्या दुःखाचे कारण असू तर अपराधीपणाची भावना आपोआप निर्माण होते आणि जर होत नसेल तर आपण भावनाशून्य आहोत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही..
"ऐकावे जनाचे करावे मनाचे" ही म्हण प्रत्यक्षात आणताना आपल्या वागण्याचा, बोलण्याचा, निर्णयाचा परिणाम एखाद्यावर कशा प्रकारे होऊ शकतो किंवा होतो याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे.
डोंबाऱ्याचा खेळ होत असताना प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या व्यक्ती त्या-त्या कलेत निपुण असतात पण त्यांना लागणारी सामग्री कमकुवत असेल तर प्रयोग फसण्याची शक्यता असते.
एखाद्याला आपला जीवनसाथी बनवताना, साथ सोडताना, स्पष्ट नकार देताना, निर्णय ऐकवताना, वचन देताना, प्रमाणापेक्षा जास्त आनंद देताना, हाक दिली की तात्काळ साद देताना, मदत करताना, निस्वार्थी राहताना त्यामागच्या परिणामांची उजळणी करणे केव्हाही हितावह !
कोरलेल्या गोष्टी लवकर पुसल्या जात नाहीत हा निसर्गाचा नियम आहे. शिल्पकार तिथे नसला तरी त्याने केलेलं कोरीव काम सतत आपल्या दृष्टीस पडत असतं त्यामुळे ते सुखावह असेल याची काळजी शिल्पकाराने घेतली पाहिजे.
आपल्या चांगल्या गुणांमुळे आपल्या आई-वडिलांची, शिक्षकांची, मार्गदर्शकांची, मित्रमंडळींची, आप्तेष्टांची आणि तत्सम सर्व व्यक्तींची मान उंचावली जाते. तसेच आपल्या केवळ एखाद्या दुष्कृत्याने या सर्वांची मान खाली देखील जाते. त्यामुळे आपल्या क्रियेला काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा विचार किमान एकदा तरी करावा.
बीज पेरलं की उगवतं, खणलं की खड्डा होतो, गडगडाट झाला की पाऊस येतो, शोधलं की सापडतं.
यातली क्रिया कोणती आणि प्रतिक्रिया कोणती वेगळं सांगायला नको..
🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !