▪️सोपं अजिबात नाही शक्य मात्र आहे..
*खचायला एखादं कारण पुरेसं ठरतं. मात्र पुन्हा उभं राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.*
माणूस का खचतो? या अवस्थेला येण्यामागे काय कारणे असू शकतात? नैराश्य म्हणजे नेमकं काय? यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येऊ शकतं? हे सगळं सोपं आहे का?
गोष्टी मनाजोग्या घडल्या नाहीत किंवा अनेकदा प्रामाणिक प्रयत्न करूनही हाती यश येत नसेल, ज्या गोष्टीसाठी आपण पात्र आहोत तिच्यापासून परावृत्त ठेवलं गेल्यास माणूस खचायला लागतो.
खच्चीकरण होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अपेक्षा. अपेक्षा ठेवणं चांगलं की वाईट हे त्या-त्या परिस्थितीनुसार सांगता येईल. प्रत्येक गोष्टीचं एक विशिष्ट स्थान असतं तिथून अपेक्षा ठेवण्यात काहीच चुकीचं नाही. निसर्गाच्या सान्निध्यात राहावं वाटल्यास समुद्राकाठी, निवांत तळ्याकाठी, एखाद्या डोंगरावर जाणं यात काही चुकीचं नाही. पण हीच गोष्ट आपण एखाद्या औद्योगिक वसाहतीत, गजबजलेल्या ठिकाणी शोधत असू तर ती चुकीची अपेक्षा आहे.
अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही परंतु जिथून तिची पूर्तता होऊ शकत नाही तिथे ठेवणं ही महाचूक !
तलावात दगड भिरकावल्यावर पाण्यावर तरंग निर्माण होतात तिथे झऱ्याचा खळखळ आवाज कसा येऊ शकतो?
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सगळं सुरळीत सुरू असताना अनपेक्षितपणे एखादी गोष्ट घडणे.
यात "मनाची तयारी" ही प्रमुख बाब असते.
परीक्षेच्या निकालात अमुक गुण मिळाले तर आनंद अमुक मिळाले तर दुःख ही आपल्या मनाची तयारी असते. परंतु सर्वच विषयात अनुत्तीर्ण राहिल्यास कितीही कणखर व्यक्ती असू द्या दुःख होणार हे ठरलेलं असतं.
मनातल्या गोष्टी कुठे व्यक्त न करता येणे, व्यक्त केल्यास आपणच दोषी ठरू का? ही भीती असणे, एकाच गोष्टीमुळे मनावर सतत आघात होणे या सगळ्यातून निर्माण होणाऱ्या अवस्थेला "नैराश्य" म्हणता येईल.
या अवस्थेतून बाहेर पडणं शक्य आहे का? सोपं आहे का?
सोपं अजिबात नाही शक्य मात्र आहे.
प्रत्येक व्याधीवर प्राथमिक उपचार म्हणजे "काळ" हे आर्यसत्य आहे.
हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होऊ लागली की घडलेल्या गोष्टींचा विसर पडायला सुरुवात होते.
ज्येष्ठ कविवर्य श्री. अरुण म्हात्रे यांचा एक मतला यानिमित्त आठवतो.
विसरता येत नाही असे नसतेच काही
मनाला सांधणारे नवे मिळतेच काही
आपलं दुःख, मनातली खंत अशाच व्यक्तीकडे व्यक्त करा जी आपल्याला समजून घेईल, त्यावर योग्य ते मार्गदर्शन करील.
"तमाशा", "हशा" यावरची गोष्ट म्हणजे "आशा".
आशेचा एक किरण वाटेत किंबहुना अंधारात चांदण्याचं काम करतो. आणि मला नाही वाटत की शीतल चांदण्यात कुणासही चटका लागत असेल.
घडलेल्या गोष्टींवर चिंतन-मनन अवश्य करावं उत्खनन मात्र करू नये. आणि केलं तर पुन्हा नवीन गोष्टीच हाताला लागतात ज्या उपयोगाच्या असतील तर उत्तम अन्यथा पुन्हा जैसे थे !
आयुष्यात एक तरी मित्र किंवा मैत्रीण अशी बनवा जी केव्हाही आपल्या हाकेला साद देईल.
माझ्या एका मतल्यामध्ये मी लिहिलं आहे..
एक व्यक्ती अशी पाहिजे जीवनी
हाक द्यावी जिला कोणत्याही क्षणी
डोंगर चढायला वेळ लागतो, आजूबाजूच्या दऱ्यांची भीतीही वाटते पण मनात जर निश्चय ठाम असेल की टोकावर जाऊन ध्वज रोवायचा आहे तर वाट सहज सर होते.
"व्यथा" आहे म्हटल्यावर "कथा" होणे स्वाभाविक आहे परंतु तिची "प्रथा" होऊ न देणे आपल्या हातात आहे !
धन्यवाद !
🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !