--- आठवणी मागे ठेवून ---
कसं ठसवायचं मनावर
एखाद्याचं अकाली निघून जाणं
शब्द ओठांवर येऊन थांबता
जसं राहतं, अर्धवट गाणं
दरवळणारा सडा फुलांचा
आज वाटतोय पालापाचोळा
शुष्क झाल्या काळजामुळे
अश्रू, पापणीतच झाले गोळा
दिवस सरला कसाबसा
रात्र कशी घालवायची?
तेल काठोकाठ असूनही का?
वात पुन्हा पुन्हा मालवायची
सत्त्वपरीक्षा असावी संयमाची
रात्र सारी, वातीतच सरली
पतन होऊन एका दिवसाचं
हजेरी आयुष्याची नव्याने भरली
जाणारा खुशाल गेला
आठवणी मागे ठेवून
देता आल्या असत्या तर
नक्कीच दिल्या असत्या
ज्याच्या त्याला परत नेऊन
🌿 सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !