वाऱ्याची मी, गातो कवने
कापत सगळी झाडे
गावी माझ्या, उरलेसुरले
श्वास मोजती वाडे
भार विजेचा, सोसत नाही
सूर्य वेठीस धरला
पाण्यासाठी, पावसाजवळ
तलावसुद्धा रडला
पक्ष्यांनाही, बेघर केले
घरटी अवघी मोडत
जनावरेही, निघून गेली
जंगल मागे सोडत
शिकार झाली, वाघाची अन
हरीण निपचित पडले
मनुष्य आहे, किती निर्दयी
त्यांनासुद्धा कळले
शंख, शिंपले, वाळू, रेती
मोह कमी ना झाला
उभी करावी, वाटत आहे
माडी प्रत्येकाला
सुरू राहिले, सत्र असे जर
उरेल शिल्लक काही?
दुर्दैवाने, हल्ली यावर
कुणीच बोलत नाही
~ सागरराजे निंबाळकर, कल्याण
संपर्क - ८८ ७९८९ ७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !