▪️लेखणीचे भोई ▪️
आवाज चढवला म्हणजे
कविता प्रसिद्ध होत नाही
थोडा का होईना पण वाव
द्यावा लागतो आशयालाही
किती दिवस ठेवणार अशी
एकमेकांच्या सणांवर बोटं
एकदा पडताळूनही घ्यावं
काय खरं नि काय खोटं
देहविक्री, बलात्कार, शोषण
यापलीकडेही जाऊ शकते कविता
हळव्या काळजाचं चित्र एखादं
जर रेखाटलं, लिहिता लिहिता
प्रतिमा नि अलंकारासोबत
वास्तवही नक्कीच सांगू
मग बघा, बाळ कवितेचं
वेळेआधीच लागेल रांगू
रसिक म्हणून ठेवू नये
केंद्रस्थानी विशिष्ट वर्ग
व्यथा, विरह, आक्रोश
अन कविताच आहे स्वर्ग
सजवून पालखी अक्षरांची
होऊया लेखणीचे भोई
खोवला जाईल सन्मानाने
पुरस्कार प्रत्येकाच्या डोई
▪️ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !