सुटेना पेच हा आता मरावे की जगावे मी
कळेना नेमके कारण किती अन् का झुरावे मी
तुझ्या पश्चात जगणे हे निरर्थक वाटते राणी
लिहावी कोणती कविता कुणाचे गीत गावे मी
मला दे दुःख तू सगळे नको पर्वा कशाचीही
मलाही वाटते कायम तुझ्या कामास यावे मी
उजेडाची सवय जडली अता अंधार सोसेना
उद्याचे स्वप्न सोनेरी कसे, केव्हा पहावे मी
कधी हसते, कधी रडते छटा लाखो मनाच्या या
अशा पेचातुनी कुठवर स्वतःला सोडवावे मी
🧿 सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !